भिवंडी,ता.०१ (बातमीदार) : शहरातील नागरिकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भिवंडी महानगरपालिकेच्या ई-बस सेवा सुरु करण्याच्या कामाला गती मिळाली असून हि सेवा कल्याण आणि उल्हासनगरपर्यंत सुरु राहील. त्यासाठी सध्या भिवंडीत तीन ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम वेगाने सुरु केले आहे.
सध्या भिवंडी महानगरपालिकेची स्वतःची सिटी बस सेवा सुरु नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेच्या बसेस भिवंडीतील नागरिकांना व प्रवाशांना बस सेवा देत आहेत. मात्र या बसेस शहरातील विविध भागात जात नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे सरकारी बसेसच्या कमतरतेमुळे नागरिकांना महागड्या रिक्षा, अस्वच्छ खाजगी वाहने आणि दैनंदिन प्रवासातील अडचणींचा सामना करून महागडा प्रवास करावा लागत होता. शहरातील नागरिकांना येणाऱ्या प्रवासाची समस्या सोडवत भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका पहिली शहर बस सेवा सुरू करत आहे. शासनाने भिवंडी शहरासाठी १०० इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यास मान्यता दिली आहे. शहराच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मते, ई-बस सेवेसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांपैकी ३५% पूर्ण झाले आहेत. नागाव, टेमघर आणि कोंबडपाडा येथील तीन चार्जिंग स्टेशन तयार झाल्यानंतर बस मार्गांची घोषणा केली जाईल. नागावमध्ये ५,३६३.५० चौरस मीटर, टेमघरमध्ये ४,४४३.२० चौरस मीटर आणि कोंबडपाडामध्ये ५,००० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले चार्जिंग स्टेशन बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. एकूण १०० ई-बसेसपैकी ७५ ई-बस नऊ मीटर लांबीच्या असतील आणि २५ ई-बस १२ मीटर लांबीच्या असतील. महापालिकेचे वार्षिक बजेट १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असूनही, शहरात एकही सिटी बस नसणे ही रहिवाशांसाठी एक मोठी समस्या होती. अनेक वर्षांपासून लोकांना कल्याण-डोंबिवली आणि ठाणे येथून येणाऱ्या बसेसवर अवलंबून राहावे लागत होते किंवा प्रत्येक ट्रिपसाठी जास्त रिक्षा भाडे द्यावे लागत होते. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे दिलेल्या निधी मधून साकारला जात आहे. त्या मध्ये केंद्र सरकारचे ६० टक्के म्हणजेच ११.२९ कोटी रुपये आणि राज्य सरकारचे ४० टक्के म्हणजेच ७.५३ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. या व्यतिरिक्त,चार्जिंग स्टेशनसाठी १४.२७ कोटी रुपये स्वतंत्रपणे मंजूर करण्यात आले आहेत, त्या पैकी १४.२१ कोटी रुपये आधीच मंजूर करण्यात आले आहेत. 
कल्याण रोडवरील विद्यार्थ्यांना धामणकर नाका येथील बीएनएन कॉलेजला पोहोचण्यासाठी दिवसातून दोनदा ऑटो-रिक्षा बदलाव्या लागतात. यामुळे पैसे आणि वेळ दोन्ही वाया जातात. काही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले की, सिटी बसेस सुरू केल्या तर अनेक समस्या दूर होतील. त्याचप्रमाणे, पद्मानगर येथील गोदामातील कामगाराने स्पष्ट केले की,त्यांच्या पगाराचा मोठा भाग प्रवासावर खर्च होतो. त्यामुळे, महानगरपालिकेकडून मिळणारी ही ई-बस सेवा शहरातील कामगार कुटुंबांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. त्याचप्रमाणे इतर नागरिकांसाठी, रुग्णालये, शाळा आणि बाजारपेठांमध्ये जाण्यासाठी परवडणारी आणि सुरक्षित प्रवाससाठी ही एक महत्त्वपूर्ण सोय असणार आहे.
————————————————————————————————————————————–
इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्याने वाहतूक कोंडी कमी होईल, हवेची गुणवत्ता सुधारेल आणि खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल अशी अपेक्षा आहे. महापालिकेचे हे नवीन वाहतूक नेटवर्क कल्याण आणि उल्हासनगरला देखील जोडेल, कल्याणमध्ये मुख्य फ्लीट कंट्रोल सेंटर असेल. या मुळे तिन्ही शहरांमधील संपर्क अधिक मजबूत होईल. नागाव आणि टेमघरमध्ये काम अंतिम टप्प्यात आहे, तर कोंबडपाड्यात चार्जिंग स्टेशनची तयारी वेगाने सुरू आहे. बस सेवेच्या सुरुवातीमुळे शहरात प्रवास करण्याचा एक नवीन आणि विश्वासार्ह मार्ग सुरू होणार आहे.
– जमील पटेल, शहर अभियंता
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
——————————————————————————————————————————————————————

