भिवंडी,ता.२४ (बातमीदार) : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सुमोटोनंतर संबंधित सरकारी प्रशासन खडबडून जागे झाले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी महापालिकेला २० डिसेंबर रोजी नोटीस बजावून मोती कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शहरात सुरू असलेल्या मोती कारखान्यांना नोटीस पाठवून कारखान्याशी संबंधित कागदपत्रे कार्यालयात जमा करण्यास सांगितले आहे. अन्यथा कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार असून ते बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर कारखानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

भिवंडीतील मोती कारखान्यांबाबत सोमोटो दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. त्याचवेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांनी २० डिसेंबर रोजी नोटीस बजावून मोती कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशानुसार पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी सुदाम जाधव यांनी मोती कारखानदारांना महापालिका प्रशासनाचा आवश्यक परवाना आणि प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आराखडा जाहिर करण्याची नोटीस बजावली आहे.त्यासोबत तीन दिवसांत खुलासा न केल्यास मोती कारखाना मालकांवर पर्यावरण (संरक्षण) कायदा १९८६, हवा, पाणी, ध्वनी प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) आणि महाराष्ट्र महानगरपालिका कायदा ३७६(अ), सार्वजनिक उपद्रव अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
भिवंडीतील मोती कारखान्यांमध्ये प्लॅस्टिक ग्रॅन्युल आणि पावडरपासून यंत्राद्वारे मोत्याच्या आकाराची रत्ने तयार केली जातात. हे रत्न लोखंडी चौकटीत रंगवलेले आहे. या दोन्ही प्रक्रियेत हानिकारक आणि दुर्गंधीयुक्त वायू बाहेर पडतात. नंतर ही फ्रेम निर्जन ठिकाणी नेऊन जाळली जाते. त्यामुळे हवेत प्रदूषण होते. एवढेच नव्हे तर कारखान्यातील कामगारही अनेक आजारांना बळी पडतात. रहिवासी भागात कारखाना असल्याने त्याचाही फटका नागरिकांना बसतो. याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे उच्च न्यायालयानेच एफआयआर दाखल करून मोती कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
भिवंडी कल्याण रोडची नवी बस्ती, शास्त्री नगर, गैबी नगर, भारत कंपाऊंड, खान कंपाऊंड, नारायण कंपाऊंड, बाबला कंपाऊंड, सुभाष नगर, रावजी नगर, खान रोड, फुले नगर, पद्मा नगर, शांतीनगर, बिलाल नगर, आझाद नगर, नागाव. नालापार अजिंठा कंपाऊंड, नारपोली यासह इतर अनेक भागात प्लास्टिकच्या दाण्यांपासून मणी बनवण्याचे कारखाने चालतात. महापालिकेच्या हद्दीतील ग्रामीण भागातही मोती बनविण्याचा हा व्यवसाय पसरला आहे.

